मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करायचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात - लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात. नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते.
मंगळागौरीची पूजा विधी
मंगळागौरीची पूजा करताना या दिवशी काही महिला उपवास ठेवतात. सकाळी स्नान केल्यानंतर मंगळवारच्या दिवशी ही पूजा करण्यात येते.
सर्वप्रथम पार्वतीची धातूची मूर्ती (सहसा अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) पूजेसाठी मांडण्यात येते. त्याच्या शेजारी महादेवाची पिंडही पुजायला ठेवण्यात येते.
त्यानंतर भटजी मंत्र म्हणून पार्वती आणि महादेवाची षोडषोपचाराने पूजा करतात. त्यानंतर मंगळागौरीची कथा सांगून मंगळागौरीची आरतीही (mangla gauri aarti) करण्यात येते.
आरती केल्यानंतर प्रसादाचे वाटप होते आणि त्यानंतर सवाष्णींना भोजन वाढून त्यांना वाण देण्यात येते.
श्री शिव आणि पार्वती हे आदर्श पती पत्नी म्हणून गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखाच व्हावा हा यामागे हेतू असतो. या पूजेच्यावेळी शक्तीतत्वाची आराधना करण्यात येते.
माता, बुद्धी, विद्या आणि शक्तीरूपात असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यामध्ये यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते.
‘गौरी गौरी सौभाग्य दे’ अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावे यासाठीही नवविवाहिता प्रार्थना करते.