राज्याच्या राजकारणात सध्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार हे राष्ट्रवादीत नाराज असल्यामुळे भाजपात जाणार असल्याचा चर्चा सुरू होतो. या चर्चा सुरू असताना यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोबतच विविध विषयावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले आंबेडकर?
पिंपरी- चिंचवड माध्यमांशी बोलत असताना त्यांना यावेळी अजित पवार आणि भाजप यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, अजित पवारांनी दोनदा बीजेपीमध्ये जातो, बीजेपीमध्ये जातो, असे म्हणाले. त्यानंतर मोदी- शाहांनी देखील दोनदा स्टेटमेंट केली. आणि दोन्ही वेळा घुमजाव केला. तर या घुमजाव करणाऱ्याला म्हणणार काय तर अजित पवारांनी मोदी आणि शाहांना उल्लू बनवलं. असे टोला त्यांनी लगावला. त्यानंतर अजित पवार भाजपमध्ये जातील असा सवाल पत्रकारांकडून करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, बघा कोणाचं कुठे, कधी मुख्यमंत्री पद चिटकेल यावर सगळ राजकारण आहे. असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी देशात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चित्रपट ‘द केरला स्टोरी’ याबाबत भाष्य केले ते म्हणाले की,'मी ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट कधीच बघत नाही. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच राजकीय वाद निर्माण केले जात आहेत. त्यासाठीच हे सर्व राजकारण सुरू आहे. खरे तर या चित्रपटातून घेण्यासारखे काहीही नसेल.' असे मत त्यांनी मांडले. पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाला दिलेल्या पाठिंब्यावरही प्रतिक्रिया दिली. 'काही जण ठरवून लग्न करतात, तर काही जण प्रेमविवाह करतात. प्रेमविवाह करताना जात, धर्म बघितला जात नाही. मात्र, पंतप्रधान मोदींना याबाबतचा अनुभव नसल्याने त्यांना लव्ह जिहाद माहिती नाही' असा टोला त्यांनी मोदींना लगावला.