राज्यात राजकीय गोंधळ सुरू असताना दुसरीकडे काही काळापासून अनेक ठिकाणी दंगली, राडे झालेला घटना समोर आल्या. त्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. मात्र, या परिस्थितीमुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. हे सर्व आरोप- प्रत्यारोप होत असताना विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. राज्यात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठे अशी दंगल झाली नाही, परंतु भाजपा-शिंदे गटाच्या सरकारच्या काळात असं घडत आहे. असे अजित पवार म्हणाले होते. त्यावरच आता या आरोपांना शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे.
अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देतांना दीपक केसरकर म्हणाले की, दंगली करणारेच सत्तेत बसले की दंगली होणारच नाहीत. त्यांनी दंगली केल्या असे मी म्हणणार नाही. परंतु कोल्हापुरात दंगल झाली तेव्हा तिथे दगड मारणारा एकही माणूस कोल्हापुरातला नव्हता. ही सगळी माणसे बाहेरून आली होती. या लोकांना कोल्हापुरात कोणी पाठवले? दंगलींचे अंदाज यांचे लोक दोन-दोन महिने आधीच कसे काय लावतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले की, मला अजितदादांबद्दल आदर आहे. तसेच दादा एक विरोधी पक्षाचे नेते आहेत, किमान त्यांनी तरी अशी वक्तव्ये करू नयेत. दादा बोलतात त्यावेळी जनता ते गांभीर्याने घेते. आमची अपेक्षा अशी आहे की, दादांनी या सरकारमध्ये यावं, दादा एक कार्यक्षम मंत्री आहेत. ते या सरकारमध्ये आले तर आम्हाला आनंद होईल. दादांसंदर्भात सध्या काय राजकारण घडतंय हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेचा फायदा हा राज्यातील जनतेला मिळाला पाहिजे. त्यासाठी चांगलं माध्यम त्यांनी निवडलं पाहिजे. ते माध्यम म्हणजे मोदी साहेब हेच आहेत. हे मला ठामपणे सांगायचं आहे. अशी खुली ऑफरच त्यांनी यावेळी अजित पवारांना दिली.