शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य आणि देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कठोर शब्दांत आपली भूमिका मांडली. मराठी भाषा, शिवसेनेतील नाराजी, २०२२ मधील पक्षफुटी, भाजपवर आरोप, आणि सरकारच्या कारभारावर त्यांनी अचूक निशाणा साधला.
युद्धपातळीवर सुरू असलेले कारस्थान
संजय राऊत म्हणाले, "युद्धपातळीवर सुरू असलेले हे कारस्थान… आणि जर कोणालातरी मुंबई घशात घालायची आहे, मुंबईतून मराठी माणूस आणि मराठी भाषा हद्दपार करायची आहे, तर हे जर कारस्थान असेल, तर शिवसेना – जिचा जन्मच मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी झाला आहे – ती शिवसेना हे विसरणार नाही. मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या हक्कांसाठीची लढाई थांबणार नाही." मराठी भाषेवरचे अतिक्रमण थांबवण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला. आणि आम्ही मराठी भाषेबद्दल जे ऋण आहे ते वाया जाऊ देणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
भास्कर जाधव यांची नाराजी?
"भास्कर जाधव म्हणतात की ते राजकीय संन्यास घेणार आहेत. संजय राऊत मला सावरतात, असं ते म्हणतात. नाराजीबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'मला सावरण्याचा प्रयत्न संजय राऊत करतात.' भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत, शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. त्यांचा राजकारणातील अनुभव फारच मोठा आहे. अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचे योगदान नक्कीच उल्लेखनीय आहे," असे राऊत म्हणाले.
"ते जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब स्वतः त्यांच्याशी बोलतील. भास्कर जाधव हे हाडाचे, आक्रमक शिवसैनिक आहेत. छान बोलतात, छान लढतात. त्यांच्या मनात काय आहे, काय वेदना आहे, हे मी नक्की समजून घेईन. कारण ते आमचेच आहेत," असेही त्यांनी नमूद केले.
सरकारवर कर्जमाफीबाबत टीका
"कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधान सतत वाद निर्माण करत आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की योग्य वेळी कर्जमाफी जाहीर करणार, तर दुसरीकडे कृषिमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच हवं. अखेरीस, कोण बोलबच्चन आहे हे ठरवावं लागेल. बोलबच्चन हा मुख्यमंत्र्यांचा आवडता शब्द आहे. पण जर कर्जमाफी योग्य वेळेला द्यायची असेल, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या एक लाखाच्या जवळ गेल्यावरच का? काय हे सरकार विक्रमी आत्महत्या घडवून मग निर्णय घेणार आहे का? हे सरकार आणि त्यांच्या घोषणा – फक्त बोलबच्चन!"