विज्ञान क्षेत्रातून दुख:द बातमी समोर आली आहे. अणूशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी पहाटे ३.२० च्या सुमारास निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने विज्ञान क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे भारताला आण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. पोखरण १ आणि पोखरण २ अणुचाचण्या यशस्वी करण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती. डॉ. चिदंबरम यांना १९७५ मध्ये पद्मश्री आणि १९९९ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. चिदंबरम यांनी भूषविलेली पदे
भाभा अणु संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक
अणुऊर्जा आयोगाचे (एईसी) अध्यक्ष, आणि अणुऊर्जा विभागाचे (डीएई) सचिव
१९९४ ते ९५ या कालावधीत ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) गव्हर्नर्स मंडळाचे अध्यक्ष
भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार
१९७५ मधील पोखरण १ आणि १९९८ मधील पोखरण २ या चाचण्यांमध्ये समन्वयक
डॉ. चिदंबरम यांना मिळालेले पुरस्कार
बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार (१९९१)
इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा सी. व्ही. रमण जन्मशताब्दी पुरस्कार (१९९८)
लोकमान्य टिळक पुरस्कार (१९९८)
वीर सावरकर पुरस्कार (१९९९)
दादाभाई नौरोजी मिलेनियम पुरस्कार (१९९९)
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे मेघनाद साहा पुरस्कार (२००२)
श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठीत पुरस्कार (२००३)
इंडियन न्यूक्लियर सोसायटीचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार (२००६)
इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचा अभियांत्रिकीमधील जीवनगौरव योगदान पुरस्कार (२००९)
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सी. व्ही. रमण पुरस्कार (२०१३)
ऊर्जा उपयोगिता परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार (२०१४)