थोडक्यात
राज्य सकारची बनवाबनवी
शेतकऱ्यांनी एक तास दिवे बंद करुन निषेध करावा
वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ९ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या सवलती सरकारने १० ऑक्टोबर रोजी रद्द केल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये जमीन महसुलात सूट, कर्ज वसुलीस स्थगिती आणि वीज बिलात माफी यांसारख्या घोषणांचा समावेश होता. सरकार लोकांसमोर वेगळे चित्र मांडत असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.
केंद्राकडून एनडीआरएफची मदत अद्याप मिळालेली नाही, तसेच कापूस खरेदीच्या अटी आणि सोयाबीनला मिळणारे अत्यल्प दर यामुळे शेतकरी संकटात आहेत. सरकार केवळ ६,५०० कोटी रुपयांचे पॅकेज देत असून, तेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागेल, असे सांगत वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिवाळीच्या दिवशी एक तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील प्रशासकीय मंडळांना बरखास्त करून मंत्र्यांसाठी भ्रष्टाचाराचा नवीन मार्ग उघडल्याचाही आरोप केला.