सारे काही अघटीत…

सारे काही अघटीत…

Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्राच्या (maharashtra) राजकारणात गेल्या दोन वर्षात अनेक राजकीय गोष्टी अद्भूत होत चालल्या आहेत…गेल्या 30 वर्षांपासून मित्र असलेले शिवसेना-भाजपा (shivsena-bjp) हे मित्र पक्ष आता पक्के वैरी झाले आहेत..एकमेकांना शह-काटशह देताना दोन्ही पक्षांनी आता तिरस्काराचे टोक गाठले आहे…भाजपाला वेगळे ठेवत काँग्रेस (congress), राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि शिवसेना हे राजकारणातील आधीचे पक्के वैरी सत्तेत एकत्र येण्याची तयारी होताच भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar) यांनी हाताशी धरून त्यांनी पहाटेचा शपथविधी उरकून घेतला… या शपथविधीसाठी दिल्लीपासून (delhi) ते राजभवन आणि भाजपाच्या निवडक मंडळींनी त्या रात्रीचा दिवस केला होता…. मात्र, मुख्यमंत्री (cm) आणि उपमुख्यमंत्री (dcm) यांच्या शपथवनिधीने स्थापन झालेले सरकार केवळ काही तासांचे ठरले आणि अजित पवार स्वगृही परतले… त्यानंततर मविआ सरकारची स्थापना झाली…

मविआचा हा डाव भाजपाच्या अत्यंत जिव्हारी लागला.. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मविआ सरकार स्थिर राहणार नाही, यासाठी विविध संसदीय आयुधांचा वापर सुरू केला आहे… विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांची कोंडी केली… राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यपदासाठी मविआ सरकारने 12 संभाव्य आमदारांची यादी पाठवली होती. राज्यपाल कोश्यारी यांनी ती यादी आजवर तशीच ठेवली आहे.. तर सत्ताधाऱ्यांनी गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विरोध बाजुच्या 12 आमदारांचे निलंबन केलं.. त्यावरून विरोधक थेट सर्वोच्च न्यायालयात गेले होते… तात्पर्य एकमेकांना शह देण्यासाठी दोन्ही बाजुंकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत… गेल्या काही दिवसात किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांनी केलेल्या एकमेकांवरील आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी भाषेचा स्तरही कमालीचा घसरवला आहे… गेल्या आठवड्यात राज्यापाल कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे मविआच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले…

ईडीच्या कारवाईत कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक रस्त्यावर उतरले… त्यातच राज्यपाल कोश्यारी यांनी थोर समाजसुधारक फुले दाम्पत्याविरूध्द वादग्रस्त विधान केल्यामुळे आता मविआ विरूध्द राज्यपाल हा सामना अधिक रंगलाय… गुरूवारी सुरू झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवातच या दोन बाजुच्या पक्षांच्या गोंधळाने झाली… अधिवेशनाच्या सुरूवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाची परंपरा आहे… गुरूवारी राज्यपाल कोश्यारी अभिभाषणासाठी येताच विरोधकांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी जोरदार घोषणाबाजी करत लावून धरली… 'राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव' अशा घोषणांची सुरूवात केली.. त्यावर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची घोषणाबाजी भाजपच्या सदस्यांनी केली… या गोंधळात राज्यपालांनी ककेवळ काही सेकंद अभिभाषण वाचून ते स्वतःच थांबवलं आणि ने विधानभवनातून निघून गेले… राज्यपालांच्या भाषणात अशाप्रकारे अडथळा आणण ही बाब राज्याच्या दृष्टीनं निंदनीय आहे.. राज्यपालांनी अभिभाषण संपवताना राष्ट्रगीत होते त्यासाठी ते न थांबल्याने त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे… आता या गोंधळानंतर राज्य सरकार आणि राज्यपाल याच्यातील धुमसणारा विरोध शिगेला पोहचण्याची शक्यता आहे…

राज्यापालांच्या अभिभाषणात घोषणाबाजी करणं हे आयुध नव्यानं वापरलं गेलं नसलं तरी अशाप्रकारे राज्यपालांना त्यांचे अभिभाषण थांबवावे लागले, ही बाब राज्यकर्त्यांसाठी आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसाठी निंदनीय आहे….महाराष्ट्राचे राजकारण पुरोगामी विचारांचे राजकारण आहे… आपल्याकडे विरोधकांचाही सन्मान करण्याची रित आहे.. मात्र, अलिकडे अशा रिती-परंपरांना हरताळ फासण्याचे सर्वपक्षीय काम सुरू आहे… राज्यपालांचे पद हे घटनात्मक पद आहे… सत्ताधाऱ्यांनी या पदाचा मान राखणं अनिवार्य आहे.. मात्र, यावेळी राज्यकर्त्यांनी लोकशाहीतील पदांचा आणि त्यावरील व्यक्तिंचा मानमरातब राखलेला नाही… राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांचे भाषण अर्थवट टाकून निघून जाणे ही बाब उद्धव ठाकरे सरकारसाठी अशोभनीय आहे.. राज्याच्या राजकारणात या अभूतपूर्व घटना राज्यासाठी अशोभनीय आहेत…याचा विचार दोन्ही बाजुंच्या राज्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे… आजचं राजकारण हे आता टोकाचं राजकारण होत चाललंय… आपसातील वादात आपण राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवतोय हे कधी लक्षात येणार..

                                                                     – नरेंद्र कोठेकर, कार्यकारी संपादक, लोकशाही न्यूज

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com