Nilesh Sable : "...कलाकारांना बोलावलं नाही!" – निलेश साबळेचा 'चला हवा येऊ द्या'बाबत खुलासा
मराठी मनोरंजन विश्वात हास्याचे नवे पर्व उभं करणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली. शाहरुख खान, सलमान खान, रोहित शेट्टी, सोनम कपूर, अनुष्का शर्मा... या हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्वांनी या मराठी कार्यक्रमात सहभागी होऊन प्रेक्षकांना सुखद धक्का दिला होता. पण, या सर्व भेटींमागे खरंच निमंत्रण होतं का? यावर नुकताच निलेश साबळेने खुद्द उत्तर दिलं आहे.
लोकशाही या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत निलेश साबळे म्हणाला, “‘चला हवा येऊ द्या’ जेव्हा नवीन होता, तेव्हा तो एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला होता. संपूर्ण भारतातच नव्हे, तर परदेशातही तो बघितला जायचा. सोनम कपूर या पहिल्या हिंदी कलाकार होत्या ज्या या मंचावर आल्या. त्यानंतर शाहरुख खान फॅन सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले.”
मात्र या हिंदी कलाकारांना शोमध्ये बोलावल्याचा आरोप अनेकदा ऐकायला मिळतो. यावर निलेशने स्पष्ट शब्दांत सांगितलं, “लोकांना वाटतं की आम्ही त्यांना बोलवलं. पण तसं काही नव्हतं. आम्ही कधीच कोणाला अप्रोच केलं नाही. ना शाहरुख, ना सलमान – कोणीच आमच्या बोलावण्यानं आलेलं नाही. उलट त्यांच्या प्रोडक्शन हाऊसेसनेच झी मराठीकडे संपर्क साधला होता.”
या वक्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली – ‘चला हवा येऊ द्या’ या शोने केवळ मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत, तर बॉलिवूडलाही या मंचाचं वजन जाणवायला लावलं. दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळी निलेश साबळे या पर्वाचा भाग असणार नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने या सीझनमधून ब्रेक घेतल्याचं समजतं आहे.निलेशच्या अनुपस्थितीत शो कसा रंगत आणि नव्या पर्वात काय धमाका होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.