Weekend Marriage : शहरी तरुणाईत 'वीकेंड मॅरेज'चा ट्रेंड ! स्वातंत्र्यासाठी नात्यांचा नवा प्रयोग
भारतीय समाजात नात्यांबाबतचे पारंपरिक विचारसरणी कायम राहिली असली तरी सध्याच्या काळात तरुणाई नव्या मार्गांचा स्वीकार करताना दिसते. त्याचंच एक अगदी वेगळं आणि चर्चेतील उदाहरण म्हणजे ‘वीकेंड मॅरेज’ एक असा विवाहप्रकार जिथे नवरा-बायको आठवड्यातून फक्त काही दिवस भेटतात, पण तरीही नात्याचं बंध जपतात.
नेमकं काय आहे वीकेंड मॅरेज?
‘वीकेंड मॅरेज’ म्हणजे अशा प्रकारचं लग्न जिथे पती-पत्नी एकत्र राहत नाहीत, तर आठवड्यातून एक किंवा दोन दिवस भेटतात. उर्वरित वेळात ते वेगवेगळ्या ठिकाणी राहून आपापल्या करिअर, छंद, जबाबदाऱ्या सांभाळतात. यामागचा उद्देश म्हणजे नात्यातील तोचतोचपणा टाळणे, व्यक्तिस्वातंत्र्य राखणे आणि एकमेकांबाबतचा ओढ जिवंत ठेवणे.
शहरी तरुणांचा नवमतवाद
मोठ्या शहरांमध्ये करिअरच्या मागे धावणाऱ्या जोडप्यांमध्ये हा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसतो आहे. बऱ्याचदा दोघांची कामाची ठिकाणं वेगळी असतात, त्यामुळे एकत्र राहणं शक्य होत नाही. काही जोडपी मात्र जाणीवपूर्वक असा निर्णय घेतात एकमेकांना थोडं ‘स्पेस’ देण्यासाठी.
त्यांचा विश्वास असतो की, दिवसातून २४ तास एकत्र राहणं म्हणजे नात्याचं यश नव्हे. त्याऐवजी, काही वेळासाठी एकत्र येऊन तो वेळ गुणवत्तापूर्ण घालवणं अधिक महत्त्वाचं आहे.
‘वीकेंड मॅरेज’चे 5 महत्त्वाचे पैलू
व्यक्तिस्वातंत्र्य आणि आत्मविकास
अशा नात्यात दोघांनाही स्वतःच्या आयुष्यासाठी भरपूर वेळ मिळतो. नोकरी, शिक्षण, छंद, मित्रपरिवार या सगळ्याला योग्य वेळ देता येतो. रोजच्या भांडणांपासून सुटका मिळते आणि वैयक्तिक पातळीवर दोघंही अधिक मजबूत होतात.
प्रेम आणि ओढ टिकवण्यासाठी उपयुक्त
रोजचं एकत्र राहणं अनेकदा सवय बनतं, पण वीकेंड मॅरेजमध्ये प्रत्येक भेट हा एक नवीन अनुभव वाटतो. आठवड्याभराने भेटल्यावर प्रेमभावना अधिक तीव्रतेने जाणवतात. अशा नात्यात रोमँटिक स्पार्क टिकून राहतो.
घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अडथळे
मुलांचं संगोपन, आर्थिक नियोजन, कौटुंबिक समस्या यांचं व्यवस्थापन वेगळं राहणाऱ्या जोडप्यांसाठी आव्हानात्मक ठरतं. वेळेवर उपस्थित राहणं किंवा निर्णय घेणं कठीण होऊ शकतं.
समाजाचा आणि कुटुंबाचा विरोध
भारतीय संस्कृती अजूनही पारंपरिक विवाहव्यवस्थेला मानते. त्यामुळे अशा ‘अनलकी’ वाटणाऱ्या व्यवस्थेवर समाजाकडून टीका होते. नातेवाईक, शेजारी अशा जोडप्यांना वेगळ्या नजरेने पाहतात, ज्यामुळे मानसिक ताण निर्माण होतो.
समजूतदारपणा आणि विश्वास हाच पाया
वीकेंड मॅरेज यशस्वी होण्यासाठी दोघांमधील संवाद, विश्वास आणि समजूतदारपणा अत्यंत महत्त्वाचा असतो. हे नातं केवळ शारीरिक जवळिकेवर टिकत नाही, तर मानसिक स्थैर्यावर आधारित असतं. निर्णय घेताना दोघांनीही परिपक्वतेने विचार करणं गरजेचं आहे.
‘वीकेंड मॅरेज’ आधुनिक काळातील नात्यांची नवी व्याख्या?
या ट्रेंडकडे फक्त एक "फॅड" म्हणून पाहणं चुकीचं ठरेल. बदलत्या जीवनशैलीनुसार नात्यांचेही नियम बदलत आहेत. काही जोडप्यांसाठी ही एक गरज आहे, काहींसाठी तर नवीन प्रकारचा प्रयोग. मात्र, यामागे कोणताही निर्णय घेताना परिपक्व विचार, परस्पर सहमती आणि नात्याची जबाबदारी जपणं अत्यावश्यक आहे.