Mumbai : अंधेरी ते वांद्रे प्रवासासाठी 90,000 उकळणारा रिक्षाचालक अटकेत

Mumbai : अंधेरी ते वांद्रे प्रवासासाठी 90,000 उकळणारा रिक्षाचालक अटकेत

मुंबईत वकिलाची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
Published by :
Shamal Sawant
Published on

अंधेरी ते वांद्रे या केवळ काही किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल 90,000 रक्कम उकळल्याप्रकरणी वकिलाची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फुरकान शेख असे या आरोपीचे नाव आहे.

फसवणूक झालेला व्यक्ती हा एका नामांकित कॉर्पोरेट फर्ममध्ये वकील म्हणून कार्यरत असून नुकताच हरियाणाहून मुंबईत स्थलांतरित झाला आहे. घटनेच्या दिवशी संबंधित वकील अंधेरीतील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथे त्यांचा चष्मा विसरल्यानंतर आणि त्यांना दृष्टिदोष असल्यामुळे, त्यांनी वांद्र्यातील निवासस्थानी परतण्यासाठी रिक्षा घेतली.

प्रवासानंतर रिक्षाचालकाने त्यांच्याकडून Google Pay द्वारे भाडे मागितले. मोबाईल स्क्रीन नीट दिसत नसल्याने वकिलाने स्वतःचा फोन रिक्षाचालकाला दिला. याचा गैरफायदा घेत आरोपीने भाड्याऐवजी थेट 90,000 वकिलाच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात वर्ग केले.

फुरकान शेखने प्रथम आपले खरे नाव व तपशील लपवले होते. मात्र, पोलिसांनी सायबर क्राइम विभागाच्या मदतीने तांत्रिक तपास करून त्याचा शोध घेतला व त्याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, तो म्हणाला की, लग्नासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठीच त्याने हे पाऊल उचलले. पोलिसांनी त्याच्या बँक खात्यातून संपूर्ण रक्कम जप्त केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com