Beed Crime : संतापजनक ! अंग काळं-नीळं पडेपर्यंत महिला वकिलाला 10 जणांकडून अमानुष मारहाण

Beed Crime : संतापजनक ! अंग काळं-नीळं पडेपर्यंत महिला वकिलाला 10 जणांकडून अमानुष मारहाण

ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान असे मारहाण झालेल्या पीडितेचं नाव असून त्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात.
Published by :
Shamal Sawant
Published on

बीडच्या आंबेजोगाईमधून एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. सनगाव येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेला शेतामध्ये मारहाण केल्याची भयंकर घटना घडली आहे. सदर महिलेचे फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या सगळ्यामध्ये सर्वत्र संताप व्यक्त केला आहे. सदरप्रकरणी पीडित महिलेने गावातील सरपंच आणि इतर व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान असे मारहाण झालेल्या पीडितेचं नाव असून त्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात.

नक्की काय घडलं ?

महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा ,लाऊडस्पीकर लावू नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात, याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. याबाबत तक्रारी दिल्याच्या रागातून ही मारहाण झाली आहे. दहा ते बारा जणांच्या टोळीने रिंगण करून अमानुष मारहाण केली आहे. या मारहाणीत संबंधित महिला वकील गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचं संपूर्ण अंग काळंनिळं झालं आहे. याबाबतचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण गावचे सरपंच आणि त्यांच्या साथीदारांकडून करण्यात आल्याचा दावा पीडित महिलेनं केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील ध्वनिप्रदूषणाची तक्रार का केली? म्हणून अशा पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. पीडितेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सगळ्या प्रकारावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, "अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणार्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडुन शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेन चा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा ,लाऊडस्पीकर लाऊ नयेत घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन ही एका रात्रीत ऊपचार करून घरी पाठवलं आहे सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे?"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com