Nashik Crime : नाशिकमध्ये बेंचवरून झालेला वाद जीवघेणा ठरला; विद्यार्थ्यांच्या हाणामारीत, एकाचा मृत्यू तर दोन विद्यार्थी....
नाशिकमधील सातपूर भागात एका धक्कादायक घटनेने स्थानिकांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. एका खासगी क्लासजवळ दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. मृत मुलाचे नाव यशराज तुकाराम गांगुर्डे (वय 16) असून, तो सातपूर परिसरातील एका शाळेचा विद्यार्थी होता. यशराज नेहमीप्रमाणे ज्ञानगंगा क्लासमध्ये शिक्षणासाठी बसने आला होता.
क्लास परिसरात पोहोचताच आधीपासून तिथे असलेल्या दोन सहध्यायांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. माहितीप्रमाणे, क्लासमध्ये कोणत्या बेंचवर बसायचे यावरून तिघांमध्ये वाद झाला होता. वाद अधिकच विकोपाला जाताच, यशराजला लाथाबुक्क्यांनी आणि छातीवर जोरदार मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तो जागीच कोसळला आणि नाकातून रक्तस्राव होऊ लागला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला तत्काळ जवळील रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन आरोपींविरोधात कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. हल्ला अचानक झाला की यामागे काही आधीचे वाद होते, हे तपासण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे सातपूरसह संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शाळा आणि खासगी शिकवणी वर्गांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी शाळांमध्ये आणि क्लासमध्ये अधिक काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.