नव्या काळातील मावळ्यांची कथा असणारा ‘हरि- ओम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मावळ्यांची कथा सांगणाऱ्या ‘हरि- ओम’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आशिष नेवाळकर, मनोज येरुणकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. ‘हरीओम’ हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. निरंजन पेडगावकर, प्रशांत, अमोल कोरडे, गणेश, राहुल यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे यांनी भूमिका साकारल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्ये जपणारा ‘हरि ओम’ हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि कथा हरिओम घाडगे यांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानणारे हे आधुनिक युगातील मावळे अन्यायाविरोधात, खोटेपणा, कायदा, सत्तेच्या गैरवापराविरोधात संघर्ष करताना दिसत आहेत.
"शिवरायांची तत्त्वं पाळणारा मी एक शिवप्रेमी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांची तत्त्वे तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, या सामाजिक भावनेने मी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट आवर्जून पाहावा.” असे चित्रपटाचे निर्माता, कथाकार आणि अभिनेता हरिओम घाडगे यांनी सांगितले आहे.