कथानक नसेल तर चित्रपटाची निर्मिती कशाला; प्रकाश झा यांचा बॉलिवूडवर निशाणा....
बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांची सध्या बॉक्स ऑफिसवर खूपच वाईट स्थिती आहे. अश्यातच प्रत्येक चित्रपट प्रदर्शित होताच फ्लॉप होण्याची चिन्हे दिसू लागतात. बॉलिवूड चित्रपट आपल्या बजेट एवढी देखील कमाई पूर्ण करू शकत नाहीत. नुकताच प्रदर्शित झालेला आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटालाही चांगलाच फटका बसला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटांच्या निराशाजनक कामगिरीवर प्रत्येकजण आपापली मते मांडत आहेत. बहिष्कार ट्रेंडसाठी बरेच लोक फ्लॉप चित्रपटाला दोष देत आहेत. यावर चित्रपट निर्माते प्रकाश झा(Prakash Jha) यांनी आपले मत मांडले आहे. प्रकाश हे बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांवर नाराज आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर बिग बजेट चित्रपटांच्या स्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे. सध्या चित्रपट निर्माते बकवास चित्रपट बनवत असल्याचे प्रकाश झा यांचे म्हणणे आहे.
सध्या प्रकाश झा त्यांच्या आगामी 'मट्टो की सायकल' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 16 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. प्रकाश झा सिनेस्तानला दिलेल्या मुलाखतीत लाल सिंह चड्ढा बद्दल बोलले तसेच चित्रपट फ्लॉप होण्यामागची कारणेही त्यांनी सांगितली.
कथानक नसेल तर चित्रपट बनवू नका
प्रकाश झा म्हणाले की हिंदी इंडस्ट्रीतील लोक हिंदी बोलतात. पण ते काय बनवत आहेत तर फक्त आणि फक्त रिमेक. जर तुमच्याकडे कथा नसेल तर चित्रपट निर्मिती बंद करा. त्यांनी कठोर परिश्रम करून काहीतरी नवीन करण्याचा विचार केला पाहिजे. इंडस्ट्रीतील लोक आळशी झाले आहेत. कथा आणि सामग्रीमध्ये गुंतवणूक करत नाहीत. लेखी वेळ देणं टाळतात. ज्यांच्या कथा चांगल्या आहेत त्यांचा बॉलिवूडमध्ये कुणीही आदर करत नाही. 8-10 व्हॅन आणि 20-25 कर्मचाऱ्यांसह शूटसाठी आलेले ग्लॅमरच आम्ही पाहत आहोत, असं म्हणत त्यांनी बॉलिवूडच्या सध्या स्थितीवर भाष्य केलं.