navneet rana and ravi rana
navneet rana and ravi rana team lokshahi

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दुर्दशा - रवी राणा

Published by :
Shweta Chavan-Zagade

१३ दिवसांचा तुरुंगवास भोगून बाहेर आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी आज (11 मे) नवी दिल्लीतून पत्रकार परिषद घेत राज्यातील ठाकरे सरकार, मुंबई महापालिकेचा कारभार यावर कडाडून टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

दिल्लीत आल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे राज्यसभेतील नेते संजय राऊत तसेच मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर टीका केली. यावेळी आमदार रवी राणा म्हणाले की, इंग्रजांनी लावलेली कलमे अनेक महान व्यक्तींवर लावण्यात आली. हनुमान चालिसा म्हटल्याने आमच्यावर राजद्रोहाचे कलम लावण्यात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालावर मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी इंग्रज काळापासूनच्या कायद्यावर मोठा निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली, राज्यावरील अरिष्ट, साडेसाती टळण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा म्हणणार होतो. पण आम्हाला १४ दिवस तुरुंगात डांबले, राजद्रोहाचे कलम लावले.

देशाचे पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी आणि कायदा मंत्री किरण रिजीजू हे असे जुनाट कायदे मोडून काढत आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. तरीही मुख्यमंत्री मात्र इंग्रजांच्या कायद्यांचा वापर करून आम्हाला तुरुंगात डांबत आहेत. सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय मिळवून दिला, याबद्दल आम्ही कोर्टाचे आभार मानतो.

आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांना चांगल्या पदाचे आमिष दाखवले, एका महिला खासदाराच्या घरात घुसून तिला तुरुंगात टाकले. 23 तारखेला यावर सुनावणी आहे. मुंबई महापालिकेने आम्हाला नोटीस दिली. 2007 मध्ये बांधली गेलेली इमारत आम्ही 7-8 वर्षे राहिलो. मुंबईत माझा एकच फ्लॅट आहे, मात्र अनिल परबांचे 15 फ्लॅट आहे हे ते विसरले असतील. मुख्यमंत्र्यांच्या प्रॉपर्टी आहेत. तरीही शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मेहनतीने एक फ्लॅट घेतला. आता त्यावर कारवाई केली जात आहे. मुंबई मनपा भ्रष्टाचाराची लंका आहे, त्यात आम्ही उतरणार, असे म्हणत आता त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.

माझे घर पाडले तर मला काही वाटणार नाही, मात्र रुग्णालयाला नोटीस देऊन त्यावर कारवाई का करता, असा सवाल रवी राणांनी राज्य सरकारला विचारला आहे. लीलावती रुग्णालयात शिवसेनेच्या नेत्यांनीही उपचार घेतले आहेत. याची आठवणही त्यांनी करून दिली.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसत मुख्यमंत्र्यांच्या पदावर बसले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मोदींच्या नावाने मते घेतली आणि सत्ता दुसऱ्यासोबत उपभोगताय, अशी टीकाही राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com