Kalyan Dombivali Train : कल्याण डोंबिवलीकरांचा जीव मुठीत घेऊन रेल्वे प्रवास
काल परवा झालेल्या दुर्दैवी अपघातात डोंबिवलीतील सोहम कठरे या विद्यार्थ्यांचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच आजही डोंबिवली रेल्वे स्थानकावर पीक अवरमध्ये गाड्या वेळेवर न आल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दोन दिवसही उलटले नसताना परिस्थितीत कोणताही बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल गाड्यांची संख्या कमी त्यातच अनेक लोकल गाड्या उशिराने धावतात . परिणामी प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी उसळली. प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणारअसा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
वारंवार होणारे उशीर, तांत्रिक बिघाड आणि नियोजनाचा अभाव यामुळे कल्याण डोंबिवलीसारख्या गर्दीच्या स्थानकावर प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. स्थानिक नागरिक व प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अतिरिक्त गाड्या सोडाव्यात, तसेच पीक अवरमध्ये काटेकोर वेळापत्रक पाळावे, अशी मागणी केली आहे.
