Saamana Editorial : हिंमतबाज 'दादा'! म्हणत अजित पवार यांना सामनाच्या अग्रलेखातून आदरांजली
(Saamana Editorial) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.
या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सामनाच्या अग्रलेखातून आदरांजली वाहण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे की, 'अजित पवार हे ‘दादा’च होते. हे दादा पर्व अकाली संपले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील अशी उमदी व तरुण मंडळी महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातून निघून गेली. जणू महाराष्ट्राच्या मराठी राजकारणाला कोणाची दृष्टच लागली. महाराष्ट्राने पुन्हा एकदा एक कर्तबगार आणि खंबीर नेता गमावला आहे.'
'अजित पवार यांच्यासारखा नेता राजकारणात नसणे म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण बेचव होणे, मंद होणे आणि दिशाहीन होण्यासारखे आहे. अजित पवारांच्या जिवावर आणि नावावर राजकारण करणारा एक मोठा वर्ग या क्षणी अनाथ व पोरका झाला आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातले एक जिद्दी आणि हिंमतबाज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. अजित पवारांच्या असंख्य आठवणी मागे राहिल्या आहेत.' असे सामनातून म्हटले आहे.
