Nanded News : धक्कादायक! जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील आकोली पुलावर बुधवारी (ता. ११) रात्री बाराच्या सुमारास एर्टिगा गाडी पुलाच्या रेलिंगला आदळली. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतक हे गंगाखेड येथील भाविक असून ते उज्जैन येथे देवदर्शनासाठी जात होते.
गंगाखेड येथील रोहन संजय राठोड (२७), कृष्णा गुट्टे (२८), बालाजी आओबा आवटे (२१) आणि बालप्रसाद उत्तमराव घोरपडे (३०) हे चार जण जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर गोपाळ गणेश रोकडे (२५) हा गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचारानंतर परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. वाहन क्रमांक एमएच १४ केएफ २७९० असलेली ही एर्टिगा गंगाखेडहून उज्जैनकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. चालक अभिजित शिंगाडे (धनगर मोहा, गंगाखेड) फरार झाला असून, जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
