Weather Update : फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल; मुंबईसह देशभर तापमानात वाढ
मुंबईसह देशातील विविध भागांमध्ये हवामानात लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. जानेवारी महिन्यात उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट जाणवत होती. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थानसह अनेक भागांत कडाक्याची थंडी पडली होती, तर हिमालयीन परिसरात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली होती. मात्र, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच या परिस्थितीत बदल झाला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई तसेच मध्य भारतातील अनेक भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उकाडा जाणवू लागला आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता वाढली असून काही भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३५.१० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, जे सरासरीपेक्षा सुमारे ४.२० अंश सेल्सिअसने अधिक आहे. फेब्रुवारी महिन्यातच इतके जास्त तापमान नोंदवले जाणे हे चिंताजनक मानले जात आहे. येत्या काही दिवसांत मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही तापमानात वाढ होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सकाळी गारवा असला तरी दुपारी कडक ऊन जाणवत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, हवामानातील हा बदल हळूहळू उन्हाळ्याकडे वाटचाल करत असल्याचे संकेत देत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
राजधानी दिल्लीमध्येही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तापमान सातत्याने वाढत आहे. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीत कमाल तापमान १७.५ अंश सेल्सिअस होते, ते आता २५.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. थंडीचा प्रभाव कमी होत चालला असून दिवसा उष्णता वाढत आहे. सकाळी आणि संध्याकाळी सौम्य गारवा असला तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे.
उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भागांत थंडी ओसरत चालली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये पुढील आठवड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. एकूणच, फेब्रुवारी महिन्यातच जाणवणारा हा उकाडा हवामान बदलांचे संकेत देणारा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या वेळेत उन्हापासून बचाव करणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.
