Today’s Top Breaking News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या ५ घडामोडी, जाणून घ्या…
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्या सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा निवासस्थानी बैठक करून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील विधानभवनात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात गट नेत्याची निवड केली जाईल.
देशभरातील लाखो रेल्वे प्रवासी २०२६ च्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सामान्य माणसाला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून खिशाला दिलासा देणाऱ्या घोषणांची अपेक्षा आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि सूत्रांनुसार, कोविड-१९ साथीपूर्वी ज्येष्ठ प्रवाशांना मिळणारी तिकीट भाड्यातील सवलत अर्थसंकल्पात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ही घोषणा झाल्यास लाखो ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळेल.
आयसीसी टी२० आय वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी शुक्रवारी दुसरा संघ जाहीर करण्यात आला. युनायटेड अरब अमिरातीने (यूएई) आपला १५ सदस्यीय संघ घोषित केला असून, अनुभवी फलंदाज मुहम्मद वसीम यांना कर्णधारपदी निवडले आहे. यूएसएनंतर यूएई हा दुसरा संघ असून, दोन्ही संघांत भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भारताला २००७ चा पहिला टी२० वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज लालचंद राजपूत यांना यूएईचा हेड कोच बनवण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजना आणि वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून, या आर्थिक वर्षाच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील निधी वितरणावर २० टक्क्यांपर्यंत कात्री लावण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन खर्चात थेट ५ टक्के कपात करण्यात आली असून, यामुळे वेतन वितरणात विलंब होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन खर्च, ओव्हरटाईम भत्ते, यंत्रसामुग्री दुरुस्ती यांसारख्या बाबींवरही कात्री लावली गेली असून, इतर एकूण खर्च सरासरी ५ ते २० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. वित्त विभागाने आज याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
गेल्या काही वर्षांत देशात पेन्शन आणि विमा कव्हरेजमध्ये लक्षणीय वाढ होत सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. गुरुवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात ही माहिती समोर आली. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) आणि पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) यांनी आर्थिक समावेशन मजबूत करून वंचितांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा राबवल्या आहेत, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे.
