Today’s Top Breaking News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या ५ घडामोडी, जाणून घ्या…
अमेरिका आणि इराणमधील तणाव चरमस्थितीत असताना इराणच्या दक्षिणेकडील बंदर अब्बास शहरात शनिवारी रात्री भीषण स्फोट झाला. इराणी सरकारी माध्यमांनुसार, हा स्फोट शहरातील मोआलेम बुलेव्हार्डवरील आठ मजली इमारतीत झाला. स्फोट इतका प्रचंड होता की इमारतीचे दोन मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, जवळची वाहने आणि दुकाने नष्ट झाली. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज एक महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठला गेला. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, त्या या पदावर पोहोचणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. राजभवन येथे झालेल्या शपथविधीत राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार उपस्थित होते.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक सुरू असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेते म्हणून निवड होणार आहे. त्यानंतर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बारामतीहून पहाटे मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. दरम्यान, 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे चार सहकाऱ्यांसह निधन झाले होते. उपमुख्यमंत्री आणि अर्थखात्याची जबाबदारी सांभाळणारे अजित पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणातच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रचंड वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर नेतृत्व, सत्ता आणि पक्षाच्या भविष्यातील दिशेबाबत चर्चा सुरू झाल्या असून, याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मोठं भाष्य केलं. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. “हा त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आज सकाळी माध्यमांतूनच हा विषय समजला,” असं सांगत शरद पवार यांनी या घडामोडींविषयी अलिप्त भूमिका घेतली.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळत आहेत. कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण, तर कधी अचानक उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये थंडीचा प्रभाव जाणवू लागला. मात्र, जानेवारी महिन्यात तापमानात सातत्याने बदल होत असल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत. हवामान खात्याने सुरुवातीला सांगितले होते की, डिसेंबरप्रमाणेच जानेवारीतही राज्यात थंडी कायम राहील.
