भारताची विजयी सुरूवात; पहिल्याच वनडेत ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने विजय
कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता आज पासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. याच एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर जोरदार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 189 धावांच्या आव्हान भारताने पाच विकेट्स शिल्लक ठेवत पार केले. यासोबतच तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 35.4 षटकात 188 धावांवर गारद झाला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने ३-३ बळी घेतले. यानंतर भारतीय संघाने 39.5 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा करत सामना जिंकला.
भारतीय संघाने एकवेळ 39 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. पण भारताचा सलामीवीर केएल राहुलने 91 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी खेळून विजय मिळवला. त्याला रवींद्र जडेजाने साथ दिली. जडेजाने 69 चेंडूत 45 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली. राहुल आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी 123 चेंडूत 108 धावांची नाबाद भागीदारी केली.