India-Pakistan War Pune : भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम; पुणे विमानतळावर 13 उड्डाणे रद्द
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता देशातील हवाई वाहतूक व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर गुरुवारी एकूण 13 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सुरक्षा कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये इंडिगो आणि स्पाइसजेट या दोन विमान कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये इंडिगोच्या ११ आणि स्पाइसजेटच्या 2 उड्डाणांचा समावेश असून अमृतसर, कोची, चंडीगड, हैदराबाद, राजकोट, जोधपूर, सुरत, भावनगर आणि जयपूर या ठिकाणांसाठी जाणाऱ्या विमान सेवा प्रभावित झाल्या आहेत.
प्रशासनाने प्रवाशांना यासंदर्भातील माहिती वेळेवर देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच, विमान कंपन्यांकडून तिकीटाची संपूर्ण रक्कम परत केली जाणार असून, पर्यायी उड्डाणांचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.