विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य न केल्यास कारवाई होणार
प्रतिनिधी | सूरज दाहाट
राज्यातील काही भागांत पावसाचं रौद्र रुप बघायला मिळालं. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. प्रचंड पाऊस झाल्यानं अनेक शहरं आणि गावं पाण्याखाली गेली. तर रायगड, सातारा जिल्ह्यासह काही ठिकाणी दरडी कोसळून मोठी जीवित हानी झाली. दरम्यान, पावसाने उसंत घेतल्यानं पाणी ओसरू लागलं असून, मदत व बचाव कार्यालाही वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पुरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत.
राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे . नदी -नाल्यांना पूर आल्याने शेतीचे भरपूर नुकसान झाले आहे. दरम्यान राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी अमरावती जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट शेतीत नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी तातडीने सर्वांचे सर्वेक्षण करा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. दादा भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्याच्या विवंचना समजून घेण्याचा प्रयत्न केला.
पीक विमा मिळण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांना टाळाटाळ करणे, कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना चांगली वागणूक, सविस्तर माहिती देण्याचे टाळाटाळ करणे यांसारख्या तक्रारींची देखील दादाजी भुसे यांनी दखल घेतली. ज्या विमा कंपन्या शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची ग्वाही यावेळी दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिली.