बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प निश्चितच लवकर पूर्ण होणार – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प निश्चितच लवकर पूर्ण होणार – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

Published by :

लोकशाही न्यूज नेटवर्क

ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींतील पात्र 272 भाडेकरू रहिवाशांना पुनर्निर्माण होऊ घातलेल्या इमारतींत त्यांच्या हक्काच्या सदनिकांची निश्चिती करण्यात आली. या सर्व पात्र भाडेकरूंबरोबर लवकरच करार केला जाणार असून या करारात त्यांना निश्चित झालेली सदनिका, इमारतीचा क्रमांक, सदनिकेचा मजला नमूद केला जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे दक्षिण मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये म्हाडा संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत झालेल्या 272 पात्र भाडेकरूंना वितरित करावयाच्या पुनर्वसन सदनिका संगणकीय प्रणालीद्वारे निश्चितीचा शुभारंभ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला. म्हाडाकडे येत्या पाच वर्षात मुंबईबाहेर परवडणाऱ्या दरातील सदनिका उभारण्यासाठी सुमारे 5 हजार एकर जमीन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, दोन ते तीन पिढ्यांना आश्रय देणाऱ्या या चाळी लवकरच नवीन रूप धारण करतील आणि या प्रकल्पाच्या नियोजनातून मुंबई शहराची नगररचना देखील सुटसुटीत होण्यास मदत होईल. बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम वेळेत व दर्जेदार होणार आहे. या प्रकल्पात येणाऱ्या तांत्रिक अडचणी शासनाने सोडविल्या आहेत.

पाच हेक्टरवर 32 चाळी
ना. म. जोशी मार्ग परळ येथे सुमारे पाच हेक्टर जागेवर एकूण 32 चाळी असून त्यामध्ये एकूण 2560 कुटुंबे वास्तव्यास आहेत. अद्यापपर्यंत 10 चाळींतील 800 भाडेकरूंचे पात्रतेबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून 607 भाडेकरू आतापर्यंत पात्र ठरले आहेत. संक्रमण गाळ्यात स्थलांतरित होण्यासाठी आतापर्यंत म्हाडाने पात्र भाडेकरूंपैकी (लाभार्थी) 314 भाडेकरूंशी जागेवरच करारनामा करून घेतला असून यापैकी 272 भाडेकरू संक्रमण गाळ्यात स्थलांतरित झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com