अहमदनगर जिल्ह्यात उद्यापासून 20 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी
संतोष आवारे, अहमदनगर | अहमदनगर जिल्हयात उदया मंदिरे खुली होत असून नवरात्रौत्सवालाही सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे जिल्ह्यात 7 ते 20 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश जिल्हा प्रशासनाने लागू केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा आदेश रात्री उशिरा काढला आहे.
पाथर्डी येथील जगदंबा देवी मंदिर, कर्जतच्या राशीनमधील जगदंबा देवी मंदिर, केडगावमधील रेणुका माता देवी मंदिर, एमआयडीसीमधील रेणुका माता मंदिर, पाईपलाईन रोडवरील रेणुकामाता मंदिर आणि नगर तालुक्यातील बुर्हाणनगर येथील तुळजा भवानी माता मंदिर परिसरात जमावबंदी आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना या आदेशाद्वारे दिल्या आहेत.
मंदिरांच्या व्यवस्थापन समितीला ऑनलाईन पासद्वारे प्रतिदिन पाच हजार भाविकांना दर्शनाला परवानगी देण्यात आली आहे.धार्मिक स्थळांभोवती यात्रा भरण्यास मनाई असणार आहे. याशिवाय हॉटेल, स्टॉल, खेळणी दुकाने, प्रसाद विक्रीची दुकाने, हार, फुले, नारळ विक्रीची दुकाने, उपहारगृहे, मनोरंजन साधनांची दुकाने, लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळांमधील अत्यावश्यक सेवेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी, जीवनावश्यक वस्तू व सेवेबरोबरच पूर्वापार परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव, समारंभ याबाबत स्थानिक परिस्थितीनुसार परवानगीचे अधिकारी जिल्हा प्रशासनाने राखून ठेवले आहेत.