Hasan Mushrif : इथेनॉलबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो पण...
केंद्र सरकारने जूनपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. देशात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं 2023-24 या काळात साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना साखरेच्या रसापासून इथेनॉल बनवू नये असे आदेश दिले होते.
याच पार्श्वभूमीवर आता मात्र इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळाली आहे. 15 दिवसांच्या आतच केंद्र सरकारकडून हा निर्णय मागे घेण्यात आला. या निर्णयामुळे साखर कारखानदार आणि उस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्यापासून कारखाने इथेनॉल निर्मिती सुरू करु शकणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, इथेनॉलबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो मात्र केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अजूनही निम्मा आहे. 17 लाख टनापर्यंतच इथेनॉलला परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. आम्हाला आशा आहे की केंद्र सरकार शंभर टक्के निर्णय घेईल.
देशात किती साखर लागणार आहे आणि किती निर्मिती होणार आहे. याचा आढावा घेऊन केंद्र सरकारने शंभर टक्के निर्मितीला परवानगी द्यावी. उद्योगासाठी 70 टक्के साखर लागते त्यांना आयात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी. साखर तज्ञ यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारकडे मागणी करणार त्यामुळे आपल्या देशात घरगुती वापरासाठी साखर पुरेल आणि त्याची किंमत देखील वाढणार नाही. असे हसन मुश्रीफ म्हणाले.