जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात शेतकरी आक्रोश मोर्चापूर्वीच गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
Published by :
shweta walge

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात शेतकरी आक्रोश मोर्चापूर्वीच गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मोर्चासाठी छापण्यात आलेल्या हस्तपत्रकात जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पाटील व महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी या प्रमुख पदाधिकाऱ्यांचेच फोटो गायब झालेले आहेत. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.

सरसकट दुष्काळ, कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कापूस व इतर पिकांना विमा लागू व्हावा यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाततर्फे ३० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच जितेंद्र आव्हाड यांचे उपस्थितीत जळगावात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा यशस्वी व्हावा व पक्षाची ताकद दाखविण्यासाठी जोरदार तयारी केली जात असतानाच पक्षातच अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे पुढे आले आहे.

या पक्षाच्या प्रचार व प्रसारासाठी हस्तपत्रक छापण्यात आलेली आहेत. त्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, पाटील अरुणभाई गुजराथी, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील व रोहिणी खडसे आदी नेत्यांचे फोटो घेण्यात आलेले आहेत.

फोटो नसल्याने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्ष रित्या नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळालं. आम्ही फोटो आणि नावासाठी काम करत नाही, तर आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आहोत. लोकांनी फक्त आमची बदनामी करावी, त्यांची कुठलीही लायकी नाही अस सुद्धा यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात कुठलीही गटबाजी नाही अस सुद्धा जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी स्पष्ट केल. फोटो आणि नावाला फारस महत्व देत नाही..असे सुद्धा जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com