Manoj Jarange Patil : आता माघार नाही घेणार उपोषण सुरु राहणार
मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, तसे न झाल्यास दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होत नाही तोपर्यंत उपोषण असणार. 2 दिवसात सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं. अध्यादेशाचं रुपांतर लवकरच कायद्यात करावं. लवकरात लवकर अधिवेशन बोलवून कायदा करा. अंमलबजावणी तातडीने सुरु करा.
तसेच मराठा समाजातील मुलांना का अडचणीत आणता? आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची आहे. आहेत ते पुरावे घ्या असं सरकारला सांगतोय. असलेले पुरावे सरकार का घेत नाही. आता माघार नाही घेणार. उपोषण सुरु राहणार. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्या. शिंदे समितीचे काम युद्धपातळीवर वाढवा. शिंदे समितीला सतत पुरावे सापडायला हवं. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.