भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन; काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याचे केले शुद्धीकरण
अभिजीत हिरे | भिवंडी | काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करणारे प्रतीकात्मक आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी संपन्न झाले. या शुद्धीकरणानंतर महिला वर्गाने या रस्त्यावर नारळ वाढवून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. याच रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी रात्री भिवंडीतील केला होता.
काल्हेर ते ताडाळी पाईप लाईन रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून नागरिक व वाहन धारकांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांची हि समस्या लक्षात घेता मागील दोन वर्षांपासून या रस्ता दुरुस्ती कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे व त्यांचे चिरंजीव गुंदवली ग्रामपंचायतचे उपसरपंच सुमित म्हात्रे यांनी मागील दोन वर्षापासून बृहमुंबई मनपाचे संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी भेट व निवेदन आणि आंदोलन करून या रस्त्याच्या नूतनीकारणासाठी पुरावा केला असल्याने त्यांच्या प्रयत्नाने हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. मात्र मंत्री कपिल पाटील हे फक्त श्रेय घेण्याचे काम करत असल्याची टिका देखील यावेळी बाळ्या मामा यांनी केली.
भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दहा वर्षांच्या कार्यकाळात भिवंडी लोकसभेत कोणतीही ठोस कामे केली नसून स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, शहरात नगरसेवक व ग्रामपंचायतींमध्ये सरपंच उपसरपंच यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचे काम खासदार कपिल पाटील यांनी केले असून ज्या ज्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या उद्घाटनाचे नारळ कपिल पाटील फोडत आहेत. त्या रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. तर ज्या रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे, त्या रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याची टीका देखील म्हात्रे यांनी यावेळी पटलांवर केली आहे.