काँग्रेस पक्ष सातव कुटुंबियांच्या पाठीशी- राहुल गांधी
दिवंगत राजीव सातव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. सातव यांच्या निधनानंतर आज ऑनलाईन श्रद्धांजली संभेचं आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या सभेला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह देशातील आणि राज्यातील काँग्रेसचे बडे नेते सहभागी झाले.
'राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाते 45 सदस्य असताना ते 5-7 व्यक्तीचे काम एकटेच करत असत', अशा काही आठवणी राहुल गांधी यांनी यावेळी सांगितल्या.
राजीव एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. सातव कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना', अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी सातव यांना श्रद्धांजली अपर्ण केली.