भांडुप बालक मृत्यू प्रकरण : ‘त्या’ विधानावर शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांचे स्पष्टीकरण
जुई जाधव | मुंबईतील भांडुमध्ये असलेल्या सावित्रीबाई प्रसूती गृहामध्ये गेल्या तीन दिवसांत चार बालकांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती घ्यायला गेलेल्या शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांसोबत केलेले संभाषण वादात सापडलं आहे. त्या वक्तव्यावर आता राजूल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन या घटनेची माहिती घेतली. तसेच मृत बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी "आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे. या नाकर्तेपणाची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी", अशा शब्दांत बालकांच्या पालकांनी आपला संताप व्यक्त केला. त्यावर राजूल पटेल "आमची कसली जबाबदारी आहे? निवडून दिलं म्हणजे असं थोडी होतं? कसली जबाबदारी स्वीकारायची? जेव्हा अॅडमिट केलं, तेव्हा आम्हाला विचारलं होतं का जबाबदारी स्वीकारायला? जबाबदारी स्वीकारायला कुठली आहे?" असा उलटा सवाल पालकांना केला होता. राजूल पटेल यांनी केलेल्या या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे त्या वादात सापडल्या होत्या.
वादावर स्पष्टीकरण
संबंधित घटनेची माहिती घेण्याकरीता मी आणि माझ्या आरोग्य समीतीच्या सदस्य गेलो होतो. नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने माझ्य़ा मनात फार संताप असल्याचे राजूल पटेल म्हणाल्या. घटनेच्या जबाबदारीवर त्या म्हणाल्या, जबाबदारी घेण्याचा विषयच नाही आहे, उलट अशा घटना पुन्हा होउ नये याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे राजूल पटेल म्हणाल्या. म्हणून मी त्यांनी बोलले असे, जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागते, त्यांना दुखावण्याचा काहीही एक उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण राजूल पटेल यांनी दिले.
विधानसभेत या घटनेची चर्चा
दरम्यान, या प्रकरणावरून राज्याच्या विधानसभेत गोंधळ झाल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं देखील त्यांनी विधानसभेत सांगितलं.