महाराष्ट्र
डिझेल वाढीचा फटका, कमी उत्पन्न असलेल्या मार्गावरील बसफेऱ्या बंद
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील शहादा, अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार या चार आगारांमध्ये डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात येत आहे. आगारात प्रवासी आल्यावर तसेच ज्या मार्गावर प्रवासी मिळण्याची शाश्वती आहे, त्याच मार्गांवर बस सोडण्याचा निर्णय आगार प्रमुखांना घ्यावा लागत आहे.
गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बस आगार ठप्प झाले होते. या दीड वर्षात शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार, नवापूर या चार आगारांना जवळपास 24 ते 25 कोटींचा तोटा झाला आहे. संचार बंदीतून शिथिलता मिळाल्यानंतर बस सेवा पूर्ववत येत होती.
परंतु इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांसह एसटी परिवहन महामंडळालाही डिझेल वाढीचा फटका बसल्याने कमी उत्पन्न असलेल्या मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.