साखरचौथ गणपतीची कल्याण डोंबिवलीमध्ये लगबग सुरू
अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर आता लगबग सुरू झाली आहे ती साखरचौथ गणपती बाप्पाची धूम पितृ पंधरवड्यात इतर सर्व शुभ कामे करणे निषिद्ध मानले जात असले तरी विघ्नहर्ता गणरायाची स्थापना मात्र या काळात केली जाते. कल्याण मध्ये शेकडो घरांमध्ये साखर चौथ गणपती विराजमान झाले आहेत दीड दिवसाचा हा उत्सव साजरा केला जातो.
रायगड ठाणे जिल्हासहित कोकणात जवळपास प्रत्येक घरात साखरचौथ गणपतीची स्थापना केली जाते. घरात काही विघ्न झाल्यामुळे बाप्पाची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला स्थापना करता आली नसल्यास किंवा नवस पूर्तीसाठी या बाप्पाची स्थापना तीन, पाच वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी केली जाते. अनेक मूर्तिकार मूर्ती तयार करण्यात व्यस्त असतात. त्याना चतुर्थीला आपल्या घरी बाप्पाची स्थापना करण्यासाठी वेळ मिळत नाही. रात्री उशिरा पर्यंत कारखान्यात गणपती बाप्पा देण्यात व्यस्त असणाऱ्या या मूर्तीकारांना बाप्पाची स्थापना करता यावी यासाठी साखरचौथ बाप्पाची स्थापना करण्याची परंपरा रूढ झाली आहे.