Mumbai Missing Children News : मुंबईत 36 तासांत 12 मुले बेपत्ता....मानवी तस्करीच्या भीतीने शहर ‘हाय अलर्ट’वर
मुंबईतून एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे. अवघ्या दीड दिवसात शहरातील वेगवेगळ्या भागांतून 12 अल्पवयीन मुले अचानक गायब झाली आहेत. यामध्ये 8 मुली असल्याने चिंता अधिक वाढली आहे. शिवाजीनगर, साकीनाका, अँटॉप हिलसह एकूण 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. परिस्थिती गंभीर मानत मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या घटनांमागे संघटित मानव तस्करी करणाऱ्या टोळ्यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या कोणत्याही कुटुंबाला खंडणीसाठी फोन आलेला नसला, तरी एकाच वेळी इतकी मुले बेपत्ता होणं संशयास्पद मानलं जात आहे.
मुलांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून रेल्वे स्थानके, बाजारपेठा, बस स्थानकं, रुग्णालयं आणि सार्वजनिक ठिकाणी छायाचित्रे लावण्यात आली आहेत. सीसीटीव्ही तपास, गस्त आणि तांत्रिक मदत यावर भर दिला जात आहे. मागील काही महिन्यांत अशा घटनांची संख्या वाढत चालल्याने मुंबईकर पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
थोडक्यात
मुंबईतील वेगवेगळ्या भागांत अल्पवयीन मुलांची अचानक गायब होण्याची नोंद.
केवळ दीड दिवसात 12 मुले गायब झाली.
12 पैकी 8 मुली, ज्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
शिवाजीनगर, साकीनाका, अँटॉप हिलसह एकूण 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घटना घडल्या.
परिस्थिती गंभीर मानत मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पालक आणि नागरिकांनी मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, संशयास्पद व्यक्तींसंदर्भात तातडीने पोलीस संपर्क साधावा.

