Assam Earthquake : रशियानंतर आता आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण
रशियानंतर आता आसाममधील गुवाहाटी येथे जमीन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. आज रविवारी 14 सप्टेंबरला आसाममधील उदलगुरी येथे 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र उदलगुरी येथे पृथ्वीपासून पाच किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात तसेच त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, त्याचसोबत आसाम व्यतिरिक्त, या भूकंपाचे धक्के भूतान आणि पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागातही जाणवले.
ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन लोक घाबरून घराबाहेर पडले. या घटनेनंतर अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.
त्याचसोबत तेथील केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी देखील ट्वीट करत म्हटलं आहे की, "आसाममध्ये मोठा भूकंप. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो. सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन!" नुकतेच दोन आठवड्यांआधी 2 सप्टेंबर रोजी देखील आसाममधील सोनितपूर येथे 3.5 रिश्टर स्केलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.