Farmers Death In Maharashtra : धक्कादायक! राज्यात 700 हून अधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; तीन महिन्यांतील आकडेवारी जाहीर
राज्य शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली असली तरी त्याचा पुरेसा परिणाम होताना दिसत नाही. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत मराठवाडा विभागातील तब्बल 501 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, त्यात बीड जिल्हा सर्वाधिक 124 मृत्यूंसह आघाडीवर आहे.
ही स्थिती अधिक गंभीर बनवणारी आकडेवारी नुकतीच विधान परिषदेच्या अधिवेशनात सादर करण्यात आली. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी याबाबत लेखी उत्तराद्वारे माहिती देताना सांगितले की, 2025 च्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणांपैकी 373 पात्र, 200 अपात्र, तर 194 प्रकरणे चौकशीत प्रलंबित आहेत.
विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या वेळेत शेतकरी आत्महत्या वाढण्याचा मुद्दा उचलण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री पाटील यांनी ही आकडेवारी स्पष्ट केली. दरम्यान, मागील संपूर्ण वर्षभरात फक्त मराठवाडा विभागातच 948 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवले होते, ही आकडेवारी चिंताजनक आहे.
जानेवारी ते 26 जून 2025 या कालावधीत मराठवाड्यात जिल्हानिहाय आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर – 87
जालना – 28
परभणी – 61
हिंगोली – 31
नांदेड – 72
बीड – 124
लातूर – 36
धाराशिव – 62
एकूण – 601