Sugar Production : राज्यात 82.55 लाख टन साखर उत्पादन; कोल्हापूर विभाग अव्वल

Sugar Production : राज्यात 82.55 लाख टन साखर उत्पादन; कोल्हापूर विभाग अव्वल

राज्यातील 2025-26 चा ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून साखर उत्पादनाने यंदा नवा टप्पा गाठला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

पुणे – राज्यातील 2025-26 चा ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून साखर उत्पादनाने यंदा नवा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 82 लाख 55 हजार टन साखर उत्पादन झाले असून मागील हंगामातील 81 लाख टनांचा टप्पा अधिकृतपणे ओलांडला आहे. त्यामुळे साखर उद्योगासाठी हा हंगाम समाधानकारक ठरत आहे.

राज्यातील सुमारे 199 हून अधिक सहकारी आणि खाजगी साखर कारखाने कार्यरत असून 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगामास सुरुवात झाली होती. सध्या 200 कारखान्यांनी मिळून 888 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. 15 मार्चपर्यंत बहुतांश कारखान्यांचा हंगाम सुरू राहण्याची शक्यता असून त्यानंतर काही मोजकेच कारखाने कार्यरत राहतील, असा अंदाज आहे.

यंदा पुणे विभागात सर्वाधिक 199.52 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तसेच पुणे विभागात 191.52 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार झाले आहे. ऊस उपलब्धता आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे पुणे विभागाने गाळपात आघाडी घेतली आहे. दरम्यान, सर्वाधिक साखर उत्पादन आणि निव्वळ साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग अव्वल ठरला आहे. कोल्हापूर विभागात 37 कारखान्यांनी सुमारे 190 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले असून 206.21 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या विभागाचा निव्वळ साखर उतार 10.85 टक्के इतका नोंदवला गेला आहे, जो राज्यातील सर्वाधिक आहे.

संपूर्ण राज्याचा सरासरी निव्वळ साखर उतार 9.29 टक्के आहे. हवामानातील अनुकूल परिस्थिती, ऊसाच्या दर्जात झालेली सुधारणा आणि कारखान्यांची कार्यक्षमता यामुळे साखर उत्पादनात वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदाच्या हंगामात उत्पादनाने मागील वर्षाचा आकडा पार केल्यामुळे शेतकरी आणि साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवसांत अंतिम आकडेवारी जाहीर होणार असून उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com