Republic Day : 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्याचे भव्य दर्शन; 30 चित्ररथ, 21स्वदेशी तोफांची सलामी
आज देशभरात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर भव्य आणि दिमाखदार प्रजासत्ताक दिन परेडचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या परेडमध्ये भारतीय सामर्थ्य, संस्कृती आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणारे ३० चित्ररथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर (National War Memorial) शहीद जवानांना आदरांजली वाहून केली. त्यानंतर कर्तव्यपथावर मुख्य सोहळ्यास प्रारंभ झाला. या भव्य समारंभाचे अध्यक्षस्थान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भूषवत असून युरोपियन युनियनचे वरिष्ठ नेते यंदाचे प्रमुख पाहुणे आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचा विशेष आकर्षण ठरले आहे ते म्हणजे प्रथमच २१ स्वदेशी तोफांद्वारे दिली जाणारी सलामी. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचे प्रतीक म्हणून ही सलामी देण्यात येत असून, भारतीय संरक्षण क्षमतेतील स्वदेशीकरणाचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे.
कर्तव्यपथावर आज सुमारे ७७ हजार प्रेक्षक उपस्थित असून, त्यांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा थेट अनुभव घेतला. सुमारे ९० मिनिटे चालणाऱ्या परेडमध्ये ६ हजारांहून अधिक सहभागी सहभागी झाले आहेत. लष्करी तुकड्या, शस्त्रसज्ज वाहनं, हवाई दलाचे फ्लायपास्ट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कर्तव्यपथ देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. ३० चित्ररथांमधून विविध राज्यांची संस्कृती, परंपरा, विकासकामे तसेच भारताची लष्करी ताकद आणि वैज्ञानिक प्रगती सादर करण्यात आली. ‘वंदे मातरम् – १५० वर्षे’ या संकल्पनेभोवती यंदाची परेड केंद्रित असून, राष्ट्रगीताच्या भावनेचा जागर या माध्यमातून करण्यात आला.
एकूणच, ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर साकारलेला हा सोहळा भारताची एकता, शक्ती, संस्कृती आणि आत्मविश्वास अधोरेखित करणारा ठरला असून, देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
थोडक्यात
• आज देशभरात भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
• प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर भव्य आणि दिमाखदार परेडचे आयोजन करण्यात आले आहे.
• या परेडमध्ये देशाची एकता, सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन घडत आहे.
• यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये एकूण ३० चित्ररथ सहभागी झाले आहेत.
• हे चित्ररथ भारतीय सामर्थ्य, समृद्ध संस्कृती आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देत आहेत.

