Udaypur Horror : कट्टरतावादाला नियंत्रित करण्याची गरज - असदुद्दीन ओवैसी

Udaypur Horror : कट्टरतावादाला नियंत्रित करण्याची गरज - असदुद्दीन ओवैसी

उदयपुर घटनेचा असदुद्दीन ओवैसी यांनी केला निषेध

नवी दिल्ली : राजस्थानमधील उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीट येथे भरदिवसा दोघांनी एका तरुणाचा गळा चिरून खून केला. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्याची हत्या करुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर सर्वच स्तरावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तर, यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही घटनेचा निषेध व्यक्त केला असून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, उदयपूरमधील घटना निषेधार्ह आहे. कोणालाही हातात कायदा घेऊन हत्या करण्याचा अधिकार नाही. यावर राजस्थान सरकार कडक कारवाई करेल, अशी आम्ही आशा करतो.

तसेच, राजस्थान पोलीस जागरुक असती तर ही घटना घडलीच नसती. माध्यमांमध्ये मी वाचले की कन्हैयालाल यांची हत्येआधी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. परंतु, नंतर ते जामीनावर सुटले. व राजस्थान पोलिसांनी दोन्ही समाजाच्या गटांची बैठक घेतली होती. पण, जसे हैद्राबादमध्ये नुपूर शर्माविरोधात एकाने वादग्रस्त टीका केली होती. तेव्हा तेलंगाणा सरकारने त्या व्यक्तीला तातडीने अटक करत जेलमध्ये टाकले होते. याचप्रमाणे राजस्थान पोलिसांनीही कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती, असेही ओवैसी यांनी सांगितले आहे.

राजस्थानमधीलच आणखी एक घटना आहे. यात एका व्यक्तीने मुस्लिम बंगाली कामगाराचा पाठलाग करुन त्याला जाळले. या घटना सांगत आहेत की कट्टरतावाद देशात किती वेगाने पसरत आहे. म्हणूनच आपल्या देशात होत असलेल्या कट्टरतावादावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ एका विशिष्ट धर्मासाठीच नव्हे तर प्रत्येक धर्मासाठी गृह मंत्रालयात कट्टरताविरोधी सेल असावा, अशी मागणी असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नुपूर शर्माने केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात वाद निर्माण झाला होता. यावर विशिष्ट समाजात नाराजी होती. अशातच कन्हैयालाल यांच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली. यामुळे काही लोकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सततच्या धमक्या मिळाल्याने कन्हैयालाल चांगलेच घाबरले होते. कन्हैयालाल यांनी धानमंडी पोलीस ठाण्यात माहिती देऊन बंदोबस्ताची मागणी केली होती. परंतु, मंगळवारी अखेर त्यांची दोन जणांनी हत्या केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com