Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांची महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांची महत्त्वाची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची ठरत असली तरी, सध्या या योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची ठरत असली तरी, सध्या या योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक महिलांच्या खात्यात अनुदानाचा हप्ता जमा न झाल्यामुळे महिलांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. जानेवारी महिन्यात अपेक्षित रक्कम न मिळाल्याने हजारो महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडणे, माहिती अपूर्ण भरणे किंवा तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांचे अर्ज बाद झाल्याचे समोर आले आहे. परिणामी, पात्र असूनही अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.

या संपूर्ण प्रकरणावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मंत्री तटकरे म्हणाल्या की, “महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही लाभार्थी महिलांकडून ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेला आहे.”

त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार या महिलांची क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकांमार्फत ही पडताळणी करण्यात येणार असून, त्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. पडताळणीनंतर पात्र महिलांना पुन्हा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार दाखल करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी महिलांकडून सातत्याने केल्या जात आहेत. अनेक महिलांना अनुदान नेमके कोणत्या कारणामुळे थांबवण्यात आले, याची माहितीच मिळत नसल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हजारो महिलांच्या अडचणीत भर पडली आहे.

या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी मोठी गर्दी केली होती. आपला हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही, ई-केवायसी पूर्ण आहे की अडचणीत आहे, याची चौकशी करण्यासाठी शेकडो महिला सकाळपासून कार्यालयात ठाण मांडून होत्या. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. एकीकडे लाडकी बहीण योजना महिलांसाठी वरदान ठरत असताना, दुसरीकडे ई-केवायसीतील त्रुटींमुळे निर्माण झालेला गोंधळ तातडीने दूर करण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com