Advay Hire : ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर तुफान हल्लाबोल
मालेगावचे भाजप नेते अद्वय हिरे यांचा आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत आज शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांचा जाहीरपणे पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळेस बोलताना अद्वय हिरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
अद्वय हिरे म्हणाले की, “२००९ साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाची लोकसभेची जागा निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपाबरोबर काम करत आहे. भाजपामध्ये गेल्यावर सर्वजण पक्ष सोडून गेले होते. देशात सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत मंत्र्याला लोकसभेत पाडून भाजपाचा उमेदवार निवडून आणला. सरपंच, जिल्हा परिषदमध्ये भाजपाची सत्ता आणली. पण, आता ५० गद्दार भाजपाच्या मांडीवर बसल्यापासून त्यांना आमची गरज राहिली नाही,” असा हल्लाबोल अद्वय हिरे यांनी केला.
“कोणत्याही व्यक्तीगत पदासाठी भाजपाकडे मागणी केली नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. तेव्हा आंदोलन करण्यात आलं. पक्षाने शेतकऱ्याला मरू दिलं, मात्र वाचवण्यासाठी भाजपाचे सरकार उभं राहू शकलं नाही. त्यामुळे भाजपाचा त्याग केला,” असं अद्वय हिरे यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “कालपासून भाजपाला माझी अचानक आठवण आली. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन आलं. त्यांना स्पष्टपणे म्हटलं की कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा राहण्यासाठी काम करु. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरेंना बसल्याशिवाय राहणार नाही,”
“शिवसेना सोडून लोकं निघून जात आहेत, हा गैरसमज आहे. जे गद्दार गेले आहेत, त्यांना जनता धडा शिकवणार आहे. मी आता बाहेर पडलोय, पण ४९ मतदारसंघात भाजपाचे नेते थांबले आहेत, ज्यांची कुचंबना होत आहे. निवडणूका जाहीर झाल्यावर ४९ मतदारसंघातून हे लोक शिवसेनेत प्रवेश करतील,” असा दावा अद्वय हिरे यांनी केला.