Air India Flight : 171 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! विमानाला हादरा बसला अन् अचानक बॅगा खाली पडल्या, जाणून घ्या काय घडलं...
12 जून रोजी झालेल्या एअरइंडियाच्या अहमदाबाद येथील विमान अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला. यात विमानातील 241 प्रवासी आणि विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 34 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच अनेक नवीन बातम्या एअरइंडियाच्या विमानाबाबतीत ऐकायला मिळत आहेत. मंगळवारी दिल्लीहून पाटणाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान AI-407 मध्ये एक नवीन घटना पाहायला मिळाली.
त्या विमानात प्रवाशांना अचानक जोरदार धक्का बसला आणि सीटवर ठेवलेल्या बॅगा खाली पडल्या. विमानाला अचानक हादरा बसल्यामुळे हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या गोंधळामुळे विमानात प्रवास करणाऱ्या 171 प्रवाशांमध्ये बराच वेळ भीतीचे वातावरण होते. मंगळवारी दिल्लीहून पाटणाला जाणारे एअर इंडियाचे AI-407 हे विमान अचानक एका टर्बुलेंस मध्ये अडकले. या परिस्थितीमध्ये हवेच्या प्रवाहात अनियमित बदल होऊन विमानाला हादरे बसतात.
यामुळे विमानाला मोठा धक्का बसला. विमानाला अचानक मोठा धक्का बसल्याने विमानामधील 171 प्रवाशांमध्ये भीती पसरली. त्यावेळी एकच गोंधळ निर्माण झाला. विमानाला जोरदार धक्का बसल्यामुळे सीटवर ठेवलेल्या सामानाच्या बॅगा खाली पडल्या. त्यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ सुरु झाली. ज्यावेळेस हा प्रकार घडला तेव्हा बरेच प्रवासी नाश्ता करत होते त्यामुळे त्यांचे गरम पदार्थ सांडल्याने काही प्रवाशांना किरकोळ इजा झाली.
मात्र थोड्याच वेळात पायलट आणि क्रू मेंबरनी परिस्थिती नियंत्रणात आणून पाटणा विमानतळावर विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग केले. विमानतळावर आल्यानंतर प्रवाशांनी पायलट आणि क्रू मेंबरचे आभार मानले. या घटनेत काही प्रवासी आणि क्रू मेंबर्सना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान विमानप्रवासात अश्या अनेक घटनांमुळे विमानप्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.