Air India : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशांना चक्कर, मळमळ; नेमकं काय घडलं ?
लंडनहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-130 विमानात सोमवारी काही प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना चक्कर येण्यासह मळमळ होण्याच्या घटना घडल्या. एकूण पाच प्रवासी आणि दोन केबिन क्रू सदस्य या त्रासामुळे प्रभावित झाल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.
विमानातील ऑक्सिजनच्या पातळीत घट किंवा अन्नातून विषबाधा झाल्याने या समस्या उद्भवल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रवासादरम्यान ही लक्षणे दिसून आल्याने क्षणभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र विमान मुंबईत सुरक्षित उतरले. उतरल्यानंतर तातडीने वैद्यकीय पथकाने उपचार दिले. त्यामध्ये दोन प्रवासी आणि दोन क्रू सदस्यांना पुढील तपासणीसाठी वैद्यकीय कक्षात दाखल करण्यात आले आणि नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, जर केबिनमध्ये हवेचा दाब कमी झाला असता, तर ऑक्सिजन मास्क आपोआप खाली आले असते. मात्र अशी कोणतीही यंत्रणा सक्रिय झालेली नसल्याने केबिन दाब कमी झाल्याची शक्यता कमी वाटते. यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पायलट मात्र पूर्णपणे सुरक्षित होते. पूर्वी अशा घटना टाळण्यासाठी प्रवासी सुरक्षित राहावे यासाठी विमान व्यवस्थापनात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पायलटसाठी वेगळ्या किचनमधून जेवण दिले जात असे, पण आता प्रवशांना जे जेवण दिले जाते तसेच विमान पायलटला ही देत आहेत.ही बाबा अशा आपत्तींमध्ये धोकादायक ठरू शकते. सदर घटनेची सखोल चौकशी सुरू असून नियामक संस्थांना याची माहिती देण्यात आली आहे.