Ajit Navle : 2 शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशाप्रकारची दडपशाही होत असेल तर ही नक्कीच निषेधार्य गोष्ट आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली. या सभेच्यावेळी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना एका तरुणाने कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी केली. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी नेते अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी आणि नेत्यांवर नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. कांद्यावर बोला अशी मागणी सभेत केल्यामुळे काही शेतकऱ्यांना ताब्यातसुद्धा घेण्यात आलेलं आहे. भारतीय लोकशाहीमध्ये ही अत्यंत लाजीरवाणी अशाप्रकारची घटना आहे. देशाचं पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे प्रचारक नसतात. ते देशाचे पंतप्रधान असतात. देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेलं धोरण हे कसं योग्य आहे हे जाणून घेण्याचा लोकशाही अधिकार या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाचा आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी जर अशी मागणी करत असतील की कांद्याच्या धोरणाबद्दल आपण बोला. आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्यावरची निर्यातबंदी उठवल्याची घोषणा केलेली आहे. मात्र ही घोषणा करत असतान कांद्याच्या निर्यातीसाठी 550 डॉलर्सचं किमान निर्यात मूल्य आणि 40 टक्के कर या अटी लावलेल्या आहेत. त्यामुळे 15 रुपयाचा घेतलेला कांदा हा परदेशात जाईपर्यंत 70 रुपयांचा होणार आहे. त्या देशात जर 40-50रुपयांना कांदा मिळत असेल तर आपला 70 रुपयांचा कांदा कुणीही घेणार नाही. या अटीशर्ती आपण का लादल्या हे जाणून घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे. 2 शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशाप्रकारची दडपशाही होत असेल तर ही नक्कीच निषेधार्य गोष्ट आहे.