'सून येऊन 40 वर्षे झाली तरीही ती बाहेरचीच' प्रश्न उपस्थित करत अजितदादांचं शरद पवारांना उत्तर
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे, अजित पवार बारामतीत प्रचारसभेत बोलताना म्हणाले होते की, "तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. यावर "शरद पवार यांनी म्हटलं की बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवं. यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार",शरद पवार यांच्या या वक्तव्यावरुन उपुमख्यमंत्री अजित पवारांनी सवाल उपस्थित करत टोला लागावला आहे. ते बारामती प्रचार सभेतून बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, जुन्या सहकाऱ्यांना जर जुना काळ आठवत असेल तर त्यांनी जुना काळ बाजूला ठेवून नवीन काळ आठवला पाहिजे. नुसती सासू सासू करून चालत नाही, सुनेला देखील मत दिली पाहिजेत. सून येऊन चाळीस वर्षे झाली मात्र अजूनही ती बाहेरचीच, मग कधी ती घरातली होणार? राज्यातील सुनांनी याचा विचार केला पाहिजे.
दिल्लीला जर मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार केला तरच कामे होतील, नाहीतर विरोध विरोधातील खासदार केला तर कामे होणार नाहीत. नुसती भाषणे देऊन चालत नाही काम त्याला कामही करावं लागतं. काहीजण म्हणतात की सरकारने निधी दिला, मात्र तो निधी द्यायला देखील धमक लागते असा टोला त्यांनी सुप्रीया सुळेंना लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, इथे कोणी पक्ष चोरलेला नाही, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी देखील पक्ष चोरलेला आहे. आम्ही काही चोऱ्या करणारे आहोत का ? आम्ही दरोडेखोर नाही? आम्ही काम करणारी माणस आहोत. सगळ्या घटक पक्षांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे आपण चांगल्या कामासाठी एकत्र आलो आहोत. जुने जे वाद असतील, ते बाजूला ठेवा. झाले गेले गंगेला मिळाल.
काहीजण म्हणतात लोकसभेला तिकडे द्या आणि विधानसभेला दादांना द्या. मात्र लोकसभेला मलाच मतदान पाहिजे. इकडच्या कामाची परंपरा टिकवायचे असेल, तर 7 तारखेला महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या संख्येने मतदान करा असं अवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
राज्यावर ग्लोबल वार्मिंगचे संकट निर्माण झाले आहे. यासंदर्भात मोदी सरकार योग्य तो निर्णय घेत आहेत. अनेकांना वाटत असेल की अजित पवार हे भाजप सोबत गेले, मात्र राजकारणात कोणी कोनाचा कायमचा शत्रू नसतो,तर कधी कोणाचा मित्र नसतो. लोकांच्या विकास कामांसाठी म्हणून मी मोदी साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
गेल्या 15 वर्षात केंद्रातून बारामती लोकसभेसाठी निधी आलेला नाही. ही भावनिक निवडणूक नाहीये. यातील अनेकजण माझ्या सभेला आले, यातील अनेकजण समोरच्या लोकांच्या सभेला जात आहेत. आपल्याकडे पद्धत असते की कुंकू एकाच लावायचं असतं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दोन्ही डगरीवर पाय ठेवता कामा नये. अनेक जणांच्या घरी चहाला जात आहेत, मग एवढ्या दिवस त्यांना सुप्यातील लोक दिसली नाहीत का? लोकसभेला वेगळ आणि विधानसभेला वेगळं केलं तर तुमच्या पायावर तुम्हीच धोंडा पाडून घ्याल असा सल्लाही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.