अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा किल्ले अजिंक्यताऱ्यावरून केला कडेलोट
प्रशांत जगताप, सातारा
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावरून सध्या प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. अजित पवार म्हणाले होते की, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा. असे म्हटले होते.
याच पार्श्वभूमीवर राजधानी साताऱ्यात किल्ले अजिंक्यताऱ्यावरुन भाजप युवा मोर्चाच्या वतीने अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.. केलेल्या वक्तव्यामुळे सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना साताऱ्यात फिरू न देण्याचा इशारा भाजप च्या वतीने देण्यात आलाय.
