"शिवसेना-राष्ट्रवादी भाजपने फोडली नाही, तर...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्पष्टच सांगितलं
दहा वर्षात काँगेस सरकारने महाराष्ट्राला १ लाख ९१ हजार कोटी दिले. पण दहा वर्षात नरेंद्र मोदी सरकारने ७ लाख १५ हजार कोटी रुपये देण्याचं काम केलं. २ लाख ९० हजार कोटी रुपये रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन आणि विमानतळासाठी देण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे आणि शदर पवार म्हणतात आमचं पक्ष भाजपने फोडला. पण मी आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करतो की, उद्धव यांच्या पुत्र मोहामुळे शिवसेना तुटली आणि पवार साहेबांच्या पुत्री मोहामुळे राष्ट्रवादी फुटली. अर्धी शिवसेना आणि अर्ध्या राष्ट्रवादीने काँग्रेसलाही अर्ध करण्याचं काम केलं. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीसोबत नरेंद्र मोदी महाराष्ट्राचं भलं करु शकतात, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते भंडाऱ्यात भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
अमित शहा जनतेला संबोधित करताना पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मतं मागण्यासाठी लोकांच्या घराघरात फिरत आहे. १९५४ मध्ये बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चा काढण्याचं काम याच काँग्रेस पक्षाने केला. काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत करण्याचं काम केलं. ५० वर्ष सरकार चालवूनही त्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिलं नाही. बाबासाहेबांचं अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं. भारतीय जनता पक्षाला ४०० सीट्स मिळाले तर भाजप आरक्षणाचा मुद्दा संपवेल. राहुल गांधी आमच्याकडे दोन टर्मचे संपूर्ण बहुमत आहे. आम्ही आरक्षणाला हटवण्यासाठी बहुमताचा उपयोग केला नाही.
आम्ही बहुमताचा उपयोग ३७० कलम हटवण्यासाठी केला. त्रिपल तलाक बंद करण्यासाठी आम्ही याचा उपयोग केला. सुनील मेंढेंना या निवडणुकीत विजयी करून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा. भंडारा-गोंदियात दिलेलं मत थेट नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यात कामी येईल. मोदींनी दहा वर्षात सर्व वचन पूर्ण केले.
मल्लिकार्जून खर्गे म्हणतात, राजस्थान आणिम महाराष्ट्रातील लोकांचा काश्मीरशी काय संबंध आहे? खर्गेजी तुम्हाला माहिती नाही, भंडारा-गोंदियाचा एक एक तरुण काश्मीरसाठी प्राण देईल. मोदी आल्यानंतर दहा दिवसात सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. मोदी गॅरंटी आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा, तीन वर्षात छत्तीसगढमधील नक्षलवाद संपवण्याचं काम मोदी सरकार करेल, असंही ते म्हणाले.