खासदार अमोल कोल्हेंचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले, "घड्याळावर लढणाऱ्या लोकांची..."
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गटात राजकीय घमासान सुरु आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. अशातच आता खासदार अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. घड्याळावर लढणाऱ्या लोकांची संख्या किती आहे, ते दाखवा. इतक्या दिल्लीवाऱ्या केल्या आणि फक्त पाच जागा मिळाल्या. त्याही दोन घरात मिळाल्या. दोन आयात केल्या आणि एका प्रदेशाध्यक्षांना मिळाली, असं म्हणत कोल्हे यांनी अजित पवार गटावर हल्ला चढवला आहे.
माध्यमांशी बोलताना कोल्हे म्हणाले, महाविकास आघाडीमधील सर्व मित्रपक्ष एकत्रितपणे प्रचार करत आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहेत. जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आहे. महायुती विरुद्ध जनता, अशी ही निवडणूक आहे. तसंच वंचितने मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केली, यावर बोलताना कोल्हे म्हणाले, हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. मला पाठिंब्या देण्याबाबत कोणत्याही नेत्याशी बोलणं झालेलं नाहीय. ते काय भूमिका घेतात, हे पाहावं लागणार आहे.
आढळराव पाटील यांच्यावर बोलताना कोल्हे म्हणाले, त्यांनी १५ वर्षांत आणलेल्या निधीचा लेखाजोखा द्यावा. मला पहिल्या वेळी मोठा निधी आणला. तुम्ही आणलेला एक मोठा प्रकल्प दाखवा, असा थेट सवालही कोल्हे यांनी केला आहे. महायुती राज्यातच टिकेल का, हा एक संभ्रम आहे. भाजपने नेत्यांची काय अवस्था केली आहे. भाजपने पक्ष फोडून नेते पळवले, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.