Anna Hazare : "शुद्ध आचार विचार असलेल्या उमेदवारांना मतदान करा"
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. दिल्ली विधानसभेसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दिल्लीतल्या 70 विधानसभा क्षेत्रांमध्ये 13,766 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. आज मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे म्हणाले की, अरविंद केजरीवाल माझ्यासोबत होता, तेव्हा त्याची नियत साफ होती. मला वाटलं एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते. मात्र पक्ष आणि पार्टी जेव्हा काढली तेव्हापासून मी त्याची साथ सोडली. मला समजलं की हा स्वार्थी आहे.
सुरुवातीला मला तो चांगला वाटला होता, त्याचे आचार विचार चांगले होते. तेव्हा त्याच्या डोक्यात पक्ष आणि पार्टी नव्हती. मात्र, आता हे दारूबाबत बोलत आहेत. आम्ही यासाठी आंदोलन केले होते त्यावेळी ते आमच्यासोबत होते. आता तेच दारूबाबत बोलत आहेत त्यामुळे मी त्याला सोडून दिले. काही लोक सांगतात की, अण्णा हजारे यांच्यामुळे हे आलेत. मात्र, ही गोष्ट चुकीची आहे. सुरुवातीला तो चांगला माणूस होता.
जो उमेदवार आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे? त्याचे आचार-विचार कसे आहेत? त्याचे जीवन कसे आहे? हे पाहूनच मतदान करा, असे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे.